मनोरंजन विश्वाला धक्का! राजू श्रीवास्तव अनंतात विलीन….

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची 42 दिवसांची जीवन-मृत्यूची झुंज अखेर आज संपली असून राजू श्रीवास्तव आज अनंतात विलीन झाले आहेत. त्यांच्या जाण्याने शोककळा पसरली आहे. ते 58 वर्षांचे होते त्यांनी अथक संघर्ष, कष्ट आणि जिद्द यांच्या जोरावर टीव्ही मनोरंजन विश्वात वेगळे स्थान निर्माण केले होते. 10 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एका हॉटेलमध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते कोमात होते. बुधवारी पुन्हा त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आणि अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.


व्यायाम करताना कोसळले होते

राजू यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. कामानिमित्त दिल्लीतील पक्षातील काही बड्या नेत्यांना भेटण्यासाठी ते दिल्लीत पोहोचले होते. 10 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या साऊथ एक्स येथील कल्ट जिममध्ये ते सकाळी वर्कआउट करत होते. यादरम्यान ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना छातीत दुखू लागले आणि ते खाली कोसळले होते. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल 42 दिवस ते कोमात होते अखेर जीवन-मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. ते 58 वर्षांचे होते.

हृदयात आढळले होते 100 टक्के ब्लॉकेज

उपचारा दरम्यान, 11 ऑगस्ट रोजी राजू यांच्यावर तातडीने अँजिओग्राफी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या हृदयात 100 टक्के ब्लॉकेज असल्याचे आढळून आले होते. ही परिस्थिती अतिशय गंभीर असल्याने डॉक्टरांनी राजू यांच्या हृदयात दोन स्टेंट लावले होते. 13 ऑगस्ट रोजी राजू यांचा एमआरआय काढण्यात आला होता. त्यामध्ये त्यांच्या मेंदूची एक नस दबली गेल्याचे समोर आले होते. राजू यांच्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी डॉक्टरांनी अनेक प्रयत्न केले होते मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

चाहत्यांना बसला हादरा

राजुच्या जाण्याने त्याच्या चाहत्यांना मोठा हादरा बसला आहे. सोशल मीडियावरुन त्याला त्याच्या लाखो चाहत्यांनी आदरांजली वाहिली आहे. त्यामध्ये त्यांनी त्याच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. राजु केवळ कलाकार म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणूनही तो प्रेरणादायी होता. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहे. राजुला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी आदरांजली वाहिली आहे. राजू श्रीवास्तव यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.