आदित्य ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर सुरक्षा काढून एकटे फिरावे : नितेश राणे

आग्रीपाडा येथे ऊर्दु भाषा भवन बांधलं जाणार असल्याने भाजपने याला कडाडून विरोध केला आहे. आज भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. ऊर्दु भाषा भवन उभारायचंच असेल तर मातोश्री टू तयार होत आहे. तिथेच ते उभारण्यात यावे असे म्हणत ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न नितेश राणे यांनी केले आहे. राज्यातील सरकार घटनाबाह्य सरकार जर असेल तर आदित्य ठाकरे सुरक्षा घेऊन का फिरत आहेत? असा सवाल करत त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. हिंमत असेल तर सुरक्षा काढून एकटे फिरावे. असे थेट आव्हान नितेश राणे यांनी त्यांना केले आहे.

आग्रीपाडा येथे ऊर्दु भाषा भवन बांधलं जाणार आहे. त्याला भाजपने जोरदार विरोध केला आहे. भाजप नेते नितेश राणे यांच्या विरोधात आग्रापाड्यात आंदोलन करण्यात आले आहे. यावरून नितेश राणे यांनी आदित्य-उद्धव ठाकरे यांना लक्ष केले आहे.

काय म्हणाले निलेश राणे?

“ज्या जागेवर ऊर्दु भाषा भवन उभारण्यात येणार आहे. त्या प्रशिक्षण केंद्रावर आयटीआय केंद्र उभारण्यात येणार होतं. पण आयटीआय केंद्राचं आरक्षण रद्द करून अचानक ऊर्दु भाषा भवनला मान्यता देण्यात आली. दहा आठवड्यात त्यासाठी 12 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. हक्काच्या आयटीआयच्या जागेवर घाईने ऊर्दु प्रशिक्षण केंद्र बांधण्याची गरज काय आहे? तुम्हाला दुसरीकडे जागा मिळत नाहीये का? ”

” आम्ही कोणत्याही जात, धर्म आणि भाषेच्या विरोधात नाही. कुणाला काय करायचं ते करा. पण आमच्या हक्काच्या जागेवर काहीही बांधलं जात असेल, आमच्या मुलांचं भविष्य अंधारात टाकलं जात असेल तर आम्ही सहन करणार नाही. महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. इथे हिंदुंवरील अन्याय सहन करणार नाही, त्यांनी थेट इशारा दिला आहे.

” आम्ही त्यांच्या हक्काच्या जागेवरती गेलो नाहीये. ते आमच्या हक्काच्या जागेवर आलेले आहेत. त्यांना जर जागा हवी असेल तर मातोश्री या ठिकाणी त्यांनी जागा पहावी. नवाब मलिक यांच्या घरी त्यांनी जागा पहावी आणि तिथे त्यांच्या ऊर्दू भवन बांधावं,” असे म्हणत ठाकरेंवर टीका केली आहे.

आदित्य ठाकरेंना थेट आव्हान

” राज्यातील सरकार घटनाबाह्य सरकार जर असेल तर आदित्य ठाकरे सुरक्षा घेऊन का फिरत आहेत? त्यांनी सुरक्षा सोडावी. हिंमत असेल तर सुरक्षा काढून एकटे फिरावे. खरंच मांजर नसशील तर एकटा फिर. मग समजेल, शेंबड्या मुलासारखं बोलू नकोस,’ अशी टीकाही त्यांनी केली.