बेळगावमधील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर कन्नड संघटनांनी हल्ला चढवत महाराष्ट्राच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावर राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून विरोधीपक्ष कमालीचे आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आमदार छगन भुजबळ यांनी कर्नाटक सरकारला कडक शब्दांत इशारा दिला असून राज्य सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.
बेळगावमधील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर कन्नड संघटनांकडून दगडफेक करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेताल आहे. यावर छगन भुजबळ म्हणाले, आज बेळगावात कन्नडी गुंडांनी महाराष्ट्राच्या गाड्यांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेध नोंदवत महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा असा इशारा कर्नाटक सरकारला दिला आहे. कर्नाटकाने गुंडगिरी थांबवली नाही तर पुन्हा एकदा गनिमी कावा दाखवावा लागेल असा देखील इशारा त्यांनी दिला आहे.
पुढे बोलताना त्यांनी विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला असून ते म्हणाले, कर्नाटक सरकार महाराष्ट्राची गावे घेण्याची घोषणा करत आणि महाराष्ट्रातील सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. महाराष्ट्र सरकारने आता यावर भूमिका घेतली पाहिजे तसेच केंद्राने देखील यात हस्तक्षेप करून कर्नाटक सरकारला कडकसमज दिली पाहिजे. हे प्रकरण कोर्टात असताना या प्रकरणाला चिथावणी कोण देत आहे याची माहिती देखील घेतली गेली पाहिजे.
पुढे बोलताना ते म्हणाले, मराठी माणसाला त्याचे उत्तर देता येत नाही असे नाही पण महाराष्ट्राच्या संयमाचा अंत कर्नाटकने पाहू नये असे खडेबोल भुजबळांनी मुख्यमंत्री बोम्माई यांना सुनावले आहे. बेळगावसह कर्नाटकातील मराठी माणसांसोबत आम्ही नेहमीच आहोत असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शरद पवारांचा अल्टिमेटम
मराठी भाषिकांवरील अन्याय येत्या 48 तासात थांबले नाहीत तर मलाही बेळगावला जावं लागेल, असा इशारा शरद पवार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दिला आहे.