नाशिकमध्ये मुलं पळवणारी टोळी समजून दोघांना बेदम मारहाण..!

नाशिक : लहान मुलं चोरणारी टोळी समजून नाशिकमध्ये पुन्हा दोघांना मारहाण करण्यात आली आहे. नाशिकमध्ये मुलं अपहरण करणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवा काही दिवसांपासून पसरत आहे. त्यामुळे प्रत्येक अज्ञात व्यक्तीकडे संशयाच्या नजरेने बघितलं जात आहे. अशात नाशिकमध्ये एका चारचाकी गाडीतून पैशांची बॅग घेऊन पळण्याच्या तयारीत असणाऱ्या दोघांना मुलं चोर असल्याचे समजून बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत संशयित जखमी झाले होते.

घडलेली घटना नेमकी काय ?

आज सकाळी गंजमाळ परिसरात दोघे संशयित चोरटे एका चार चाकी गाडीचा नंबर प्लेटवर कलर टाकून गाडीमध्ये असलेले बॅग पळवण्याच्या तयारीत होते. हे वाहनचालकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी चोर चोर असा आरडाओरडा केला. त्यामुळे संशयित चोरट्यांनी भयभीत होऊन होऊन समोरच असलेल्या पंचशील नगर झोपडपट्टीकडे पळ काढला. परिसरातील नागरिकांनी चोर चोर ऐकून मुलं चोर असल्याचे समजून दोघे संशयीतांना बेदम मारहाण केली. यात संशयित जखमी झाले आहे. हे दोघे भाऊ असून ते मूळचे औरंगाबादचे रहिवासी आहेत. साहिल लक्ष्मीकुंठे आणि प्रभास लक्ष्मीकुंठे अशी त्यांची नावे आहेत.

पहा व्हिडीयो*👇

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वेळेत घटनास्थळी जाऊन दोघं संशयितांना लोकांच्या तावडीतून सोडलं. सध्या या दोघांना उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र ही घटना बघता नाशिकमध्ये गेल्या काही दिवसापासून पसरलेल्या मुलं चोरणारी टोळी सक्रिय होण्याच्या अफवांनी नागरिकांवर किती परिणाम केला आहे हे दिसून येत आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन करण्याची वेळ पोलिसांवर वारंवार येते आहे.

लहान मुलं पळवणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवा ; पालक भयभीत

सध्या नाशिकमध्ये मुलांचे अपहरण करणारी टोळी सक्रिय असलेल्या अफवांचे पीक पसरले आहे. समाज माध्यमांवर तसेच संदेश व्हायरल होत आहे. पोलीसांनी हा संदेश फेक असल्याची माहिती देखील दिली आहे. मात्र नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती अजूनही त्यांच्या मनात घर करून आहे. त्यामुळे नागरिक प्रत्येकाला संशयाच्या नजरेने बघत आहे. याआधीही नाशिकमध्ये ब्लॅंकेट विक्रेत्यांना लहान मुलं चोरणारे समजून जबर मारहाण केल्याची एक घटना समोर आली होती. त्यानंतर आता पुन्हा ही घटना समोर आली आहे. सांगली येथेही याच संशयाने साधूंना महंतांना मारहाण झाली होती. तर धुळे येथेही लहान मुळे चोरणारे समजून गोसावी समाजाच्या भिक्षुकांना चोप दिला होता.