‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शेवटच्या रांगेत’, रोहित पवारांनी व्यक्त केला संताप

नीती आयोगाच्या रांगेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेवटच्या रांगेत उभे केल्याने रोहित पवारांनी यावर टीका केली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत उभं करणं चुकीचं आहे, महाराष्ट्र राज्य हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा इंजिन आहे आणि त्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत उभं करणे चुकीचं आहे. असं म्हणत रोहित पवार यांनी फोटो ट्विट करत केंद्रावर टीका केली आहे.

रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेवटच्या रांगेत असलेला फोटो पोस्ट केला आहे त्याखाली ते लिहितात. ‘एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक #मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत नीती आयोगाची सातवी बैठक पार पडली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते. पण या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना योग्य स्थान दिलं गेलं नसल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मात्र, रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर भाजपनेही उत्तर दिलं आहे. राष्ट्रपती संबोधित करत असताना एकनाथ शिंदे पहिल्या रांगेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याजवळ होते. त्यावर रोहित पवार काही बोलले नाही, पण शेवटच्या रांगेवरुन टीका केली जात आहे, हे योग्य नाही असं भाजप नेते राम कदम यांनी म्हटलं आहे. सत्तेत नसल्याचं दु:ख बाहेर येत असल्याचा टोलाही राम कदम यांनी लगावला आहे.