नाशिकमध्ये पोलिसांच्या वाहनाला अपघात; ३ पोलीस जखमी

नाशिक : जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरु आहे. दरम्यान आता पोलिसांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना समोर येत आहे. मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील लिअर कंपनीजवळ पोलिसांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. पोलिसांचे वाहन नाशिकहुन मुंबईच्या दिशेने जातांना ही घटना घडली आहे. भीषण अपघातात पोलिसांच्या वाहनाने तीन पलट्या मारल्याचे देखील समजत आहे.

प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्याप्रमाणे तीन वाहनांचा हा अपघात झाल्याची माहिती आहे. दरम्यान एक वाहन अपघात होताच घटनास्थळावरून पसार झाले आहे. ह्या घटनेत नाशिक शहर दलाचे ३ पोलीस जखमी झाले आहेत. संतोष भगवान सौंदाणे (वय ५७), सचिन परमेश्वर सुक्ले (वय ४३), रविंद्र नारायन चौधरी (वय ३७) अशी जखमी पोलिसांची नावे आहेत.

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांना अपघाताची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने अपघाताच्या ठिकाणी दाखल होऊन जखमींना वाडीवऱ्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.

-नाशिकमध्ये पोलिसांच्या वाहनाला अपघात

-मुंबई आग्रा महामार्गावर झाला अपघात

-इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील लिअर कंपनीजवळ घडली घटना

-भीषण अपघातात पोलिसांच्या वाहनाने मारल्या तीन पलट्या

-तीन वाहनांचा झाला अपघात, एक वाहन घटनास्थळावरून झाले पसार

मंगळवारी रात्री इगतपुरी जवळ भीषण अपघात झाला होता. या अपघातात ३ युवक ठार झाल्याची दुखद घटना घडलेली असताना या घटनेला रात्र उलटत नाही तोच पुन्हा एका अपघाताची घटना समोर आली आहे. पोलिसांच्या वाहनाच्या अपघाताची घटना इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील लिअर कंपनीजवळ घडली असून कालचा अपघात इगतपुरी च्या पंढरपूरवाडी समोर झाला आहे.

इगतपुरी ते नाशिक दरम्यान रोज लहान मोठे अपघात सुरु आहेत. ह्या अपघातांची कारणे शोधून त्यावर युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. एकामागून एक अपघातांच्या मालिका सुरु असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वारंवार या ठिकाणी अपघातांचे कारण शोधून त्यावर उपाय करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यात अपघातांच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्ष देखील नाशिक शहर आणि जिल्हा भीषण अपघाताचे साक्ष राहिला आहे. दरम्यान या वर्षीही पहिल्या दिवसापासून वारंवार अपघातांच्या घटना घडत आहे. अनेक घटनांमध्ये जीवितहानी देखील झाली आहे.