धक्का लागे डायरेक्ट खून! चाकूने सपासप वार करत तरुणाची निर्घृण हत्या

जळगावातील चोपड्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. धक्का लागल्याच्या वादातून एका तरुणाची चाकूने सपासप वार करत हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. २) रात्रीच्या सुमारास चोपड्यातील विरवाडे गावात घडली आहे. या घटनेने गाव-परिसर हादरला असून जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. भोजू वासुदेव कोळी (वय. ३२) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलिसांनी एक महिला आणि ४ जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोजु कोळी आणि दीपक कोळी यांचा एकमेकांना धक्का लागला, या कारणावरून त्यांच्यात आधी बाचाबाची झाली, यावरून ४ जणांच्या टोळक्याने भोजु कोळी व राजेंद्र कोळी यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली, नंतर या टोक्यातून एकाने राजेंद्र याच्या डोक्यात दगड मारला, राजेंद्रचे डोके फुटले, त्यामुळे राजेंद्र आणि भोजू हे घरी गेले.

मात्र एवढे होऊनही सागर देविदास कोळी (वय. ३०), दिपक सुभाष कोळी (वय.३०), कैलास गुलाब कोळी (वय. ३५), मनोहर संतोष कोळी (वय. ४०) व शोभाबाई देविदास कोळी (वय. ४५) हे सर्व भोजू याच्या घरी गेले, घरासमोर अंगणात येवुन भोजु व त्यांच्या वडिलांस शिवीगाळ, दमदाटी करत लाथा-बुक्यांनी मारहाण केली.

दरम्यान, संशयित आरोपी सागर कोळी याने त्याच्याजवळील चाकुने भोजू याच्या मानेजवळ, पाठीवर चाकूने अनेक वार केले, यात भोजू गंभीर जखमी होऊन मृत्यू पावला.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनला वासुदेव कोळी यांच्या फिर्यादीवरून भादंवि कलम ३०२, ३३७, ३२३, ५०४, ५०६ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पाचही संशयीतांना अटक केली असून पुढील तपास करत आहेत.