नाशिक : एक ते भगतसिंग होते, जे देशासाठी शहीद झाले, आणि एक हे, ह्या भगतसिंह यांनी त्या पदावर राहताना तारतम्य बाळगले पाहिजे. एकेरी भाषेत उल्लेख करतात, तुमची लायकी काय आहे ? अशी प्रतिक्रिया भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. शिवाजी महाराज यांनी जे केलं, तिथे आपण पोहोचू शकत नाही, छत्रपती शिवाजी महाराज फक्त मते मिळवण्यासाठी आहे का? असे त्यांनी यावेळी राजकारण्यांचे कान टोचले आहेत. सोबतच त्यांनी नवीन नवीन राज्यपाल यांचे स्वागत केले असून ते म्हणाले, त्यांना जे काही सहकार्य लागेल, ते करू असे उदयनराजे म्हणाले आहेत. उदयनराजे भोसले हे भाजपच्या प्रदेश कार्यकारणी बैठकीसाठी नाशिकमध्ये आले होते. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत संवाद साधला.
अखेर भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल पदाचा दिलेला राजीनामा मंजूर झाला असून एकप्रकारे त्यांची महाराष्ट्रातून उचलबांगडी करण्यात आली आहे. भगतसिंग कोश्यारी यांनी राजीनामा द्यावा यासाठी उदयनराजे देखील आग्रही होते, यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात, अशा व्यक्तींनी, मग कुणीही असो, त्यांनी जबाबदारीने वक्तव्य करायला हवे, कारण नसताना कुठलेही विधान करणे, यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातात. असे उदयनराजे यावेळी म्हणाले.
जगात मोठे योद्धे होऊन गेले, मात्र त्यांनी साम्राज्य वाढविण्याकरिता युद्ध केले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी लोकांच्या कल्याणासाठी राज्य केले. ज्यांची उंची नाही, कधी ती उंची गाठू शकत नाही, असे लोकं जेव्हा विधान करतात, ही विकृती आपल्याला पाहायला मिळते. कारण त्यांच्या विचारांची व्याप्ती ही संकुचित आहे. अशी टीका उदयनराजे यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी देशाला कुटुंब समजले, आताच्या लोकांमध्ये अहंकार निर्माण झालाय. आता परिवार म्हणजे फक्त मी आणि मी..एवढं व्यक्तीकेंद्रित झालंय अशी खंत उदयनराजे यांनी बोलून दाखवली.
एक ते भगतसिंग होते, जे देशासाठी शहीद झाले, ह्या भगतसिंह यांनी त्या पदावर राहताना तारतम्य बाळगले पाहिजे, एकेरी भाषेत उल्लेख करतात, तुमची लायकी काय आहे? शिवाजी महाराज यांनी जे केलं, तिथे आपण पोहोचू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज फक्त मते मिळवण्यासाठी आहे का ? असा सवाल त्यांनी केला आहे. माझी विनंती आहे की, शिवाजी महाराज यांचा आदर करा, त्यांचा अवमान खपवून घेणार नाही,
राष्ट्रपती, पंतप्रधान या सगळ्यांना आम्ही पत्रव्यवहार केला, खंत वाटते की, उशीर झाला आहे. एक म्हण आहे, वेळेत जर निर्णय घेतला, तर बरंच काही सावरता येतं असे उदयनराजे म्हणाले आहेत.
यावेळी उदयनराजे यांनी तरुण व्यक्तींना राज्यपाल होण्याची संधी देण्याची मागणी केली आहे, ते म्हणाले, राजकारणात देखील निवृत्तीचे वय ठरलं पाहिजे. आपण नेहमी म्हणतो की, तरुणांना वाव दिला पाहिजे. पण एक म्हण आहे, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. ऐन उमेदीतील वर्ष समजून घेतले पाहिजे. राज्यपाल या पदावर अनुभव असलेले, पण वय जास्त नसलेले व्यक्ती याबद्दल विचार करावा असे मत उदयनराजे यांनी व्यक्त केले आहे.