नाशिक : मालेगावात हत्येचा एक अत्यंद धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत एका महिलेचा खून करून तिच्या शरीराचे तुकडे कोणीतरी अज्ञाताने फेकून दिले आहे. अत्यंत क्रूर अशी ही घटना असून या घटनेने जिल्ह्यातील गुन्हेगारीत भर पडली आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने केलेल्या या हत्येच्या घटनेने मालेगाव हादरले आहे.
घडलेली घटना अशी की, दहीदी गावाजवळ शेती असलेले एक कुटुंब या ठिकाणी राहत असून २ दिवसांपूर्वी या घरातील महिला सकाळी सकाळी शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी गेल्या होत्या. तर त्यांचे पती शेतीमालाच्या विक्रीसाठी बाहेरगावी गेले होते. ते शेतीमालाची विक्री करून सायंकाळी घरी परतले. मात्र त्यांना घरी आल्यावर पत्नी दिसेना म्हणून त्यांनी शोधाशोध सुरु केली. ते आधी पत्नीला शोधत त्यांच्या शेतात गेले. मात्र त्या मिळून आल्या नाही. म्हणून त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना बोलावले आणि सगळ्यांनी मिळून शोध सुरु केला.
शोध करत असताना शेतात रक्ताने माखलेले फावडे त्यांना आढळून आले. त्यानंतर शेतापासून जवळपास एक किलो मीटर अंतरावर असलेल्या जंगलात त्यांना महिलेचे शीर, धड आणि पाय असे शरीराचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अतिशय क्रूरपणे ही हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक हादरले आहे. हा खून नेमका कोणी केला या बद्दल अद्याप काहीही माहिती समोर येऊ शकली नाही.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस श्वानपथकासह दाखल झाले होते. रात्री उशिरा मृतदेह मालेगावात आणण्यात आला आणि त्यानंतर महिलेचा अंत्यविधी करण्यात आला आहे. खून का करण्यात आला..? एवढ्या निर्गुण पद्धतीने खून करण्याचे काय कारण असावे असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे. मात्र या घटनेने पुन्हा एक क्रूर हत्येचे साक्षीदार व्हावे लागत आहे. या आधी मालेगावात मुलांनी आईचा खून (Malegaon murder cases) केल्याची घटना समोर आली होती.
पैशाच्या वादातून दोन मुलांनी जिने जग दाखवले त्याच आईचा गळा घोटून तिचा खून केला होता. मालेगावात ३० जानेवारी रोजी सकाळी ही घटना घडली होती. बया प्रकरणी आई आणि लेकांच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या मुलांना छावणी पोलिसांनी अटक केली. दोन्ही घटनांनी मालेगाव हादरले आहे.