युवा शेतकऱ्याचे मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहित सवाल; आम्ही बिहार..

राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील एक युवा शेतकऱ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या रक्ताने पत्र लिहित, आम्ही महाराष्ट्रात राहतोकी बिहार मध्ये असा सवाल केला आहे. हा युवा शेतकरी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील असून, सेनगाव तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या भागात पंचनामे झाले. तालुका प्रशासनाने 32 कोटी 23 लाख 47 हजार 200 रुपये एवढा निधी अतिवृष्टीधारकांमध्ये वितरीत होणार असे म्हटले. मात्र सेनगाव तालुक्यातील गोरेगाव, आजेगाव, बाभूळगाव आणि पुसेगाव हे चार मंडळे अतिवृष्टीतून वगळण्यात आली. त्यामुळे येथील शेतकरी निराश झाले असून या युवा शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहून सवाल केला आहे.

पत्र होतेय व्हायरल

भागात अतिवृष्टी झाली असूनही मदत नाकारल्या कारणाने एका युवा शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले, ते पण रक्ताने त्यामुळे हे पत्र सध्या व्हायरल होत असून याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे या पत्रावर आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून काय उत्तर येते आता याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

हे आहे ते पत्र

मा. मुख्यमंत्री महाराष्ट्रात एकनाथ शिंदे साहेब,

विषय:-आम्ही महाराष्ट्रात राहतो का.. बिहारमध्ये…? अतिवृष्टीतून वगळ्याल्या प्रकरणी…

सेनगाव तालुक्यात पेरण्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अनेक शेतकरी देशोधडीला लागले. सगळे राजकारणात गुंतले होते. सोबत कृषी विभागालाही विसर पडला..

सेनगाव तालुक्यातील शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना आपण अनेक मंडळे नाकारली. तालुक्यात सर्व दूर पाऊस असताना आपण तीन मंडळे अतिवृष्टीतून नाकारली. मग आम्ही महाराष्ट्रात नसून बिहारमध्ये राहतो का.?

साहेब, अधिवेशनात घोषणा केली.. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.. मग हे काय खाजगी कंपनीने नाकी नऊ आणले? जगायचे कसे ते सांगा..

अन्यथा अंगात राहिलेल्या बाकी रक्ताने अभिषेक करून आम्ही आमचे जीव सोडून देऊ.. अनुदान द्या..