नाशिक : शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रभर २२ फेब्रुवारीला रस्त्यावर उतरणार आहे. स्वाभिमानी शेकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी ही माहिती दिली आहे. प्रलंबित असलेल्या अनुदानासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी २२ फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा केली गेली आहे.
‘संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना विविध प्रश्न भेडसावत आहे .या प्रश्नांकडे मात्र सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. आपल्या खुर्च्या टिकवण्यामध्येच सत्ताधारी व्यस्त दिसताय. प्रत्येक विभागात शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. या प्रश्नावर सत्ताधारी लक्ष देत नाही. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सरकार प्रयत्न करत नाही .या सगळ्या विषयांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २२ फेब्रुवारीला स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरणार आहे.’ अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
‘थकित वीज बिलापोटी वीज कंपनी शेतकऱ्यांच्या विजेचे कनेक्शन तोडत आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई असताना विजेचे कनेक्शन तोडले तर शेतकऱ्यांचे पीकं करपून जातील व तो उध्वस्त होईल म्हणून हे विजेचे कनेक्शन तोडू नये तसेच कृषी संजीवनी योजनेची मुदत वाढ ३१ मार्चपर्यंत देऊन ५० टक्के पेक्षा कमी बील घेऊन वीजबिलातून शेतकऱ्यांना मुक्त करावे. तसेच रासायनिक खतांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी सबसिडी देऊन रासायनिक खतांच्या किमती नियंत्रित करायला हव्या. ज्या ज्या शेतकऱ्यांनी पिकविमा साठी तक्रारी नोंदवल्या आहे त्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे तातडीने देण्याचे आदेश द्यावेत. बुलढाणा येथे आंदोलक शेतकऱ्यांवर अमानुष लाठीचार्ज ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी केला त्यांची खातेनीहाय चौकशी करावी. सोयाबीन ,कपाशी, कांदा, द्राक्ष यासारख्या अनेक पिकांचे बाजारभाव पडले आहे. सरकारने हस्तक्षेप करून हे बाजारभाव पूर्वव्रत करण्यासाठी हस्तक्षेप करून प्रयत्न करावे. अशा प्रमुख मागण्या घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर २२ फेब्रुवारीला रस्ता रोको करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांचे लोकप्रतिनिधींचे लक्ष जावे यासाठी आंदोलन तीव्र स्वरूपात होणार आहे,’ असे संदीप जगताप यांनी सांगितले.
आज सत्ताधारी आणि विरोधक हे फक्त एकमेकांवर चिखल फेक करून दिवस घालवत आहे. परंतु इकडे शेतकऱ्यांची मात्र राख रांगोळी झाली आहे. त्याकडे कोणाचेच लक्ष नाही नाशिक जिल्ह्यामध्ये ६२ हजार शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव होत आहे. त्याविरुद्ध झालेल्या बिऱ्हाड मोर्चात दिलेले आश्वासन अजून शासनाने पूर्ण केलं नाही. कांद्याचे भाव पडले आहे. बांगलादेश सारखं छोटं राष्ट्र भारतावर डोळे वटारत आहे. द्राक्षावरील ३२ % असणारी इम्पोर्ट ड्युटी ६४% केली त्यावर केंद्र सरकार हतबल दिसत आहे. परिणामी द्राक्षाचे भाव पडले यासारख्या अनेक प्रश्नांवर शेतकरी संतप्त आहे. म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये सरकारचे लक्ष या प्रश्नांकडे वेधन्यासाठी २२ फेब्रुवारीला आम्ही ताकदीने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात रस्त्यावरती उतरणार आहोत.
संदीप जगताप
प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना