बालदिनीच अघटित घडले! २ बहिणींवर कालचा घाला..

औरंगाबाद : बालदिनाच्या दिवशीच अघटित घडले! कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींवर काळाने झडप घातली असून त्यांचा पाझर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटना कन्नड तालुक्यातील नागद भिलदरी शिवारातील पाझर तलावामध्ये घडली असून घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मात्र बालदिनीच अशी दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काजल पवार, मीनाक्षी पवार असे मृत बहिणींची नावे आहेत.

काजल पवार, मीनाक्षी पवार या दोघी बहिणी नेहेमीप्रमाणे शिवारातील पाझर तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. बऱ्याच वेळा नंतरही दोन्ही मुली घरी आल्या नाही. यामुळे त्यांचे कुटुंबीय गाव शिवारातील पाझर तलावाकडे गेले. तेथे तलावाच्या शेजारी कपडे दिसून आले. त्यामुळे तलावात त्यांचा शोध घेतला मात्र ते कुठेही दिसल्या नाहीत.

कुटुंबीयांनी आणि काही ग्रामस्थांनी सर्वत्र शोधाशोध केली जरावेळाने त्यांना मुलींचे मृतदेह तलावात आढळून आले. त्यावेळी कुटुंबीयांनी जागीच हंबरडा फोडला. घटनेने परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावावर शोककळा पसरली आहे.

दोन्ही बहिणींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलिसांनी धाव घेऊन मृत मुलींना नागद प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. नागत प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी दोन्हीही सख्या बहिणींना तपासून मृत घोषित केले. याबाबत कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, लहान मुलांना पाण्याच्या ठिकाणी न जाऊ देणे याची पालकांनी काळजी घेणे गरजचे आहे. त्यामुळे मोठे मोठे अनर्थ टळू शकतात असे आवाहन पोलिसांनी केले आहे.