नाशिक स्मार्ट सिटी कंपनी विरोधात नागरिकांचे आंदोलन! वाचा काय आहे प्रकरण..

नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीने विकासकामे करण्याच्या नावाखाली नाशिकच्या पंचवटीतील गोदावरी किनारी असलेल्या नीलकंठेश्वर मंदिरालगतच्या पुरातन पायऱ्या फोडल्या होत्या. याचे पडसाद नाशिकमध्ये उमटले. स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात नाशिककरांनी तीव्र आंदोलन छेडले होते. त्यामुळे या सर्वांकडे दुर्लक्ष करणाऱ्या स्मार्ट सिटी कंपनीचे झापडे आता उघडले असून स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे आणि इतर अधिकाऱ्यांनी नागरिकांसमवेत आता या भागांची पाहणी केली आहे. त्यांनी ही कामे लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.

काय आहे प्रकरण?

स्मार्ट सिटी कंपनीतर्फे गोदावरी किनाऱ्यावर सुरू असलेली विकास कामे अनेकदा वादात सापडले आहे. यावर वेळोवेळी नागरिकांनी आक्रमक भूमिका देखील घेतली होती. असेच यावेळी नाशिक स्मार्ट सिटी कंपनीने विकासकामे करण्याच्या नावाखाली नाशिकच्या पंचवटीतील गोदावरी किनारी असलेल्या नीलकंठेश्वर मंदिरालगतच्या पुरातन पायऱ्या फोडल्या होत्या. यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे काही दिवसांपूर्वी नाशिककर आक्रमक होऊन त्यांनी स्मार्ट सिटी कंपनीच्या विरोधात जोरदार आंदोलन केले होते.

तसेच काल स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत या नागरिकांची बैठक झाली होती. जनतेचा वाढता रोष बघता स्मार्ट सिटीच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाग आली आणि आज स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे आणि इतर अधिकाऱ्यांनी नागरिकांसमवेत पाहणी केली आहे.

या दुरावस्था झालेल्या पायऱ्या, तसेच इतर कामे देखील येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामांवर स्वतः जातीने लक्ष घालण्याची मागणी नागरिकांनी केली. तसेच आगामी काळात अशाप्रकारे नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचे  काम करू नये, अन्यथा नागरिकांच्या रोशाला सामोरे जावे लागेल असा इशारा देखील दिला आहे.