केंद्रीय मंत्री भारती पवारांच्या आईच मंगळसूत्र चोरटयांनी पळवलं

Nashik News: नाशिक शहरात केंद्रीय मंत्र्यांच्या आईचं मंगळसूत्र चोरट्यांने पळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नाशिक : नाशिक (Nashik) शहरातील गुन्हेगारी नवीन नाही. अख्ख्या महाराष्ट्रात नाशिकचं नावं आता गुन्हेगारीसाठी घेतलं जाऊ लागलं आहे. अशातच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आणखी एक घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या आरटीओ (RTO) परिसरात दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी चक्क केंद्रीय मंत्री भारती पवार (Bharati Pawar) यांच्या आईच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविल्याची घटना समोर आली आल्याने खळबळ उडाली आहे. 

नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी पोलिसांसह (Nashik Police) नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. सातत्याने घटनांनी नाशिक शहर हादरत असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाशिक गुन्हेगारीबाबत काही दिवसांपूर्वी चिंता व्यक्त केली होती. सामान्य नागरिक तर अशा घटनांमुळे दहशतीखाली आहेत. मात्र आता थेट केंद्रीय मंत्र्यांच्या आईचं मंगळसूत्र चोरट्यांने पळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या आईचं मंगळसूत्र चोरटयांनी पळवल्याची घटना आरटीओ परिसरात घडली असून यात दुचाकीवरून आलेल्या चोरटयांनी दोन ते अडीच तोळ्यांची सोन्याची पोत हिसकावल्याचे समोर आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या मातोश्री शांताबाई बागुल या आरटीओ परिसरामध्ये राहतात. तिथे जवळ असलेल्या भाजी बाजारात काल सायंकाळी त्या भाजी घेण्यासाठी गेल्या होत्या. याचवेळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील दोन ते अडीच तोळ्याची सोनसाखळी हिसकावत पळ काढला. या घटनेनंतर नागरिक देखील मोठ्या संख्येने जमा झाले होते. मंत्र्यांच्या आईची सोनसाखळी चोरी गेल्याने हा चर्चेचा विषय ठरला होता. अशा परिस्थितीत शांताबाई बागुल या प्रचंड घाबरल्या होत्या, त्यांनी तात्काळ म्हसरूळ पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. घटनास्थळावरून संशयित फरार झाले असून अद्यापही ते पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. मात्र गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील गुन्हेगारीत वाढ झालेली दिसून येत आहे. खून, प्राणघातक हल्ले, चोऱ्या अशा घटना वारंवार घडत आहेत. आता कुठेतरी मंत्री महोदयांचे कुटुंबीय देखील सुरक्षित नसल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.

नेमकं काय घडलं?

केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या मातोश्री शांताबाई बागुल या आरटीओ परिसरामध्ये राहतात. त्या काल सायंकाळी दुर्गा नगर भागात भाजी आणण्यासाठी गेल्या असता ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गळ्यात हात टाकत सोन्याची पोत हिसकून घेत पळ काढला. पोत ओरबाडल्याचे कळाल्यानंतर आरडाओरड केली, मात्र आजूबाजूला माणसे नसल्याने संशयित पसार झाले. त्यांनी तात्काळ म्हसरूळ पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. घटनास्थळावरून संशयित फरार झाले असून अद्यापही ते पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

अशा गुन्हेगारांना आम्ही सोडणार नाही…. 

दरम्यान मंत्री डॉ. भारती पवार यांच्या आईची सोनसाखळी हिसकावण्यात आल्याची घटना घडली. यावर पवार म्हणाल्या की, ही गुन्हेगारी रोखण्यासाठी नक्कीच काम चालू आहे. येणाऱ्या काळात अशा गुन्हेगारांना आम्ही सोडणार नाही. आज ना उद्या पकडले जातीलच, असा विश्वास भरती पवार यांनी व्यक्त केला. तर या प्रकरणावर सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट करत गृहमंत्र्यांनी देखील लक्ष घालावे अशी मागणी केली आहे. यावर पवार म्हणाल्या की, अशा प्रकारच्या घटनांनी काही सरकारला आनंद होत नाही. आमच्या गृहमंत्र्यांचे लक्ष असून अनेक घटनांचा शोध देखील लावला आहे. कुठेतरी आपणही काळजीने राहावं, ही विनंती असे उत्तर भारती पवार यांनी दिले आहे. 

source abp