नवरा-बायकोतील भांडणात निष्पाप मुलांचा बळी! २ मृत, एकाची मृत्यूशी झुंज..

नागपूरमध्ये काळजाचा ठेका चुकवणारी एक घटना घडली आहे. नवरा-बायकोतील भांडणात निष्पाप मुलांचा बळी गेला. घरात होणाऱ्या सततच्या वादाला कंटाळून एका पित्याने स्वतःच्या मुलांना विष पाजले आणि नंतर स्वतः आत्महत्या केली आहे. यात ७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून 12 वर्षीय मुलगा मृत्यूशी झुंज देत आहे. ही धक्कादायक घटना नागपुरातील वैष्णवदेवीनगर परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून चिमुकल्यांची अवस्था पाहून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मनोज अशोक बेले (वय ४५) असे पित्याचे नाव आहे. तनिष्का (वय ७) असे मृत मुलीचे नाव आहे. प्रिन्स (वय १२) मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज आणि प्रिया हिचा 13 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन मुल झाली. तनिष्का दुसरीत तर प्रिन्स सहाव्या वर्गात शिकत होता. लग्नानंतर मनोज आणि प्रिया यांच्यात वाद व्हायला लागले त्यामुळे 6 वर्षापूर्वी दोघांनी संगनमताने वेगळे राहायचे ठरवले. मात्र दर रविवारी मुले मनोजला सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत भेटायला जातील, असा निर्णयही यावेळी दोघांनी घेतला होता.

दरम्यान, सर्व काही सुरळीत होत होते, मात्र मागील काही दिवसांपासून मनोज आणि प्रिया यांच्यात पुन्हा वाद व्हायला सुरुवात झाली. या रविवारी (दि. १५) सकाळी प्रिया यांचे वडील प्रिन्स आणि तनिष्काला घेऊन वाठोडा चौकात आले. प्रिन्स आणि तनिष्काला मनोजच्या स्वाधीन केले. मनोज दोन्ही मुलांना घेऊन घरी गेला. त्यांच्यासोबत खेळला. त्यांना नाश्ताही दिला. दुपारी 4.30 वाजतापर्यंत प्रिन्स आणि तनिष्का घराबाहेर खेळत होते. मनोजने त्यांना आवाज देऊन घरात बोलावले. त्यांना पुन्हा नाश्ता दिला. यात विष होते. दोघेही बेशुद्ध झाले. मनोजने दोरीने दोघांचा गळा आवळला. त्यानंतर लाकडी बल्लीला दोरी बांधून स्वत: गळफास घेतला.