नाशिक बाजारसमितीत पाचशे कोटींचा भ्रष्टाचार

नाशिक | प्रतिनिधी
मुंबईत महापालिकेतील पाचशे कोटींचा भ्रष्टाचाराची घटना ताजी असतानाच आता नाशिक बाजार समितीत पाचशे कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

राज्यात नाशिक बाजारसमिती प्रसिद्ध आहे. जिल्हाभरातील शेतकरी आपला माल या ठिकाणी आणत असतो. त्यामुळे येथील बाजारसमितीची आर्थिक उलाढाल कोटीच्या घरात आहे. सध्या या बाजारसमितीवर राष्ट्रवादी ची सत्ता आहे. मात्र या बाजारसमितीत पाचशे कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

दरम्यान या भाजप पदाधिकारी सुनील केदार, दिनकर पाटील यांनी ईडी कार्यालयात तक्रार दाखल केली असून २०१३-१४ या वर्षात लेखापरिक्षणात हा घोटाळा उघड झाल्याचा दावा करण्यात आला आहे. केदार यांनी पूराव्यांची अनेक कागदपत्र सादर केल्याने खळबळ उडाली आहे.

सुनील केदार यांच्या मते तब्बल २० वर्षात हा घोटाळा अब्जावधींचा असून सरकार अणि शेतकरी यांची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. तसेच या प्रकरणाची तातडीने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे.