एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडल्यास वर्ग बंद!

नाशिक । प्रतिनिधी
राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शाळा उद्या, सोमवारपासून सुरू होत असून शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. मुलांमध्ये थोडेही लक्षणं आढळल्यास चाचणी करून घ्यावी. एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यास ज्या वर्गातील विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला तो वर्ग बंद ठेवावा,” अशी सूचना शिक्षण विभागाकडे करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी दिली.

राज्यात कोरोनाची तिसरी लाट हळूहळू ओसरू लागली आहे. त्यामुळे सरकारने राज्यभरातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज, सोमवारपासून मुंबईत शिशू वर्ग ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होत आहेत.

तथापि, ‘लोकल सर्कल कम्युनिटी प्लँटफॉर्म’ने केलेल्या एका सर्वेक्षणात ६२ टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले, पालकांनी काळजी करण्याचे कारण नसून जगभरातील शाळांचा अभ्यास करूनच राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, असाही शाळा सुरू करण्याचा हेतू आहे.त्यामुळे पालकांनी काळजी न करता नियम पाळावेत, असे आवाहनही राजेश टोपे यांनी केले.

रुग्णसंख्या आटोक्यात आल्यास निर्बंध शिथिल
जनतेने नियम पाळल्यास राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येईल आणि राज्यात लागू केलेले निर्बंध मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून कमी करण्यात येतील, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. राज्यात लस घेणे सक्तीचे नाही. मात्र, आरोग्यासाठी लस घेणे नागरिकांना भाग पाडले जाईल, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.