मुंबईत कोरोनाचा कहर, राज्य प्रशासनाची तातडीची बैठक

नाशिक | प्रतिनिधी

मुंबईत कोरोनाचा विस्फोट झाला असून एकाच दिवशी चार हजाराच्या आसपास कोरोना बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान एकीकडे थर्टी फस्ट आणि ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लावले जात असतांना आजच्या आकडेवारीने राज्याची चिंता वाढली आहे. एकीकडे काही दिवसांपूर्वी कोरोनाचा दुसरी लाट ओसरली असा विश्वास देणाऱ्या प्रशासनाची या आकड्यांनी झोप उडवली आहे.

आज दिवसभरात राज्यात एकूण पाच हजार ३३८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली तर एकट्या मुंबईत हा आकडा ३९२८ इतका आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचे संकट गडद होत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

या पार्श्वभूमीवर आता नव्याने बैठक घेण्यात आली असून काय निर्बंध लावावे याबाबत चर्चा झाली आहे. त्यामुळे अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार असून आज किंवा उद्या निर्बंध लावण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.