खरशेतच्या महिलांची जीवघेणी कसरत थांबली!

नाशिक । प्रतिनिधी

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरशेत येथील महिलांच्या पाण्यासाठी चाललेल्या जीवघेणा प्रवास थांबणार आहे, कारण तास डोहाच्या त्या जीवघेण्या जागेवर आता लोखंडी पूल बसविण्यात आला आहे.

त्र्यंबकेश्वरसह इतर ग्रामीण आदिवासी भागात आजही महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरशेत येथील भयावह परिस्थिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. त्यांनतर प्रशासन खडबडून जागे झाले. तसेच लोकप्रतिनिधींनी याची दखल घेत पाहणी केली.

दरम्यान आज युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी लोखंडी पूल उभा करण्यात आला आहे. हा लोखंडी पूल पाहिल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे तर येथील महिलांनी आभार मानले आहेत.

मात्र त्र्यंबक तालुक्यातील आजही अनेक गावांना अशीच परिस्थिती पाहायला मिळते आहे. येथील महिलांचा पाण्यासाठी अजूनही संघर्ष सुरू असल्याचे दिसून येते. त्यामुळे लोकप्रतिनिधीनी एकत्र यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.