मनमाड-येवला रोडवर दरोडेखोरांची टोळी जेरबंद

नाशिक । प्रतिनिधी
घरफोडी आणि दरोड्यासारखे गंभीर गुन्हे करून फरार झालेल्या अट्टल दरोडेखोरांच्या टोळीला मनमाड येवला रोडवर जेरबंद करण्यात आले आहे. एलसीबीच्या पथकाने हि कामगिरी केली आहे.

नाशिक जिल्ह्यासह धुळे, अहमदनगर आदी भागात घरफोड्या, दरोडा टाकण्याचे प्रमाण मोठ्याप्रमाणावर वाढले आहे. असे असताना या गुन्ह्यातील टोळ्या शिताफीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होतात. यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे असताना नाशिकच्या एलसीबीच्या पथकाला मोठे यश आले आहे.

मनमाड-येवला मार्गावर गस्तीवर असताना अचानक एलसीबीच्या पथकाला काही व्यक्ती संशयास्पद वावरत असल्याचे दिसून आले. यावेळी पथकाने सापळा रचून यशस्वीरीत्या दरोडे खोरांच्या टोळीला ताब्यात घेतले. मात्र यातील एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला. हे दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने या परिसरात असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अटक करण्यात आलेले चारही संशयित दरोडेखोर आहेत. त्यांनी जिल्ह्यात काही चोऱ्या केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून १० लाखांहून अधिकच ऐवज जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्यातील एक साथीदार फरार झाला असून त्यांचा कसोशीने शोध सुरू असून त्यांच्याकडून इतर अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले.