राणेंची जहरी टीका; म्हणतात उद्धव ठाकरेंची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी….

उद्धव ठाकरेंची अवस्था ही पिसाळलेल्या कुत्र्यासारखी झालीय, पिसाळलेल्या कुत्र्याचं काय करायचं, हे मला वेगळं सांगायची गरज नाही, अशा शब्दांत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे. रविवारी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते पत्रकारांशी संवाद साधत होते.


निलेश राणेंचा घणाघात

रविवारी ( दि. २५ ) अमरावतीत आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावर बोलताना राणे म्हणाले की, “उद्धव ठाकरे असे पिसाळले आहेत की, त्यांना काय करावं हेच सुचत नाहीये आणि पिसाळलेल्या कुत्र्याचं काय करायचं? हे मला वेगळं सांगायची गरज नाही. अशा पिसाळलेल्या लोकांचं काय करायचं, हे मी सकाळीच सांगितलं आहे. ते ठाकरे आहेत. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं. त्यांच्याविरोधात काही गोष्टी कडकच घेतल्या पाहिजेत” असे म्हणत निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.


राणे म्हणतात.. उद्धव ठाकरेंना फटके दिले पाहिजे..

राणे पुढे म्हणाले की, “संतोष बांगर यांच्यावर गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. यावरून दिसतंय ते चांगल्या भाषेत ऐकणार नाहीत, असं दिसतंय. त्यांना फटकेच द्यायला पाहिजेत. त्यांना त्यांच्या भाषेत बोललं पाहिजे कारण त्यांना दुसरी भाषा कळतच नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पहिल्या भाषणापासून सांगत आहेत की, आमचा संयम तोडू नका. पण जर यांना संयम तोडायचा असेल तर कधी ना कधी दोन हात होणारच. त्यासाठी उद्धव ठाकरेंनी तयार राहावं”, असा इशाराही निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.