जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनो वेळेत पोहचा अन्यथा..!

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्हा परिषदेत आता बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्यात येणार असून लेट येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आळा बसणार आहे.

जिल्हा परिषद स्तरावरील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना आता वेळेत पोहचावे लागणार आहे. कार्यालयात येताना व कार्यालय सोडताना बायोमेट्रिक नोंद करावी लागणार आहे. जिल्हा परिषदेतील कर्मचारी वेळेत उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर आता बायोमेट्रिक पद्धत अवलंबण्यात येत आहे. ०१ डिसेंबर पासून या बायोमेट्रिक हजेरी सुरुवात होणार होती मात्र तांत्रिक अडचणींमुळे आता आजपासून सुरवात झाली आहे. यामुळे आता ‘लेट लतीफ’ कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई होणार आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि कर्मचाऱ्यांच्या हाताचे ठसे घेण्याचे काम बाकी असल्याने कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंद करण्यात आली होती. मात्र, आता हे काम पूर्ण झाल्यामुळे बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात आली आहे.