राजापूरसह ४१ गावे पाणीपुरवठा योजनेला तांत्रिक मान्यता

येवला | प्रतिनिधी

येवला मतदारसंघातील अवर्षणप्रवण व दुष्काळी पट्ट्यातील राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे मुख्य अभियंता यांच्याकडून तांत्रिक मान्यता मिळाली असून प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे.

या योजनेसाठी लागणाऱ्या निधी व इतर पूरक बाबींसाठी मंत्री छगन भुजबळ यांचा पाठपुरावा सुरु असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष तथा येवला बाजारसमितीचे प्रशासक सभापती वंसत यांनी दिली आहे.

विधानसभा अध्यक्ष वसंत पवार यांनी म्हटले आहे की, कायम दुष्काळाच्या छायेत राहिलेल्या येवला मतदारसंघाला टँकरमुक्त करण्याचा प्रयत्न मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून केला जात असून मतदारसंघातील राजापूरसह ४१ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व धुळगावसह अठरा गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या दोन योजना पूर्ण झाल्यानंतर भुजबळांच्या माध्यमातून येवला मतदारसंघ हा टँकरमुक्त होणार आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत अवर्षणप्रवण व दुष्काळी पट्ट्यातील राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ यांनी नुकतीच या योजनेस तांत्रिक मान्यता दिलेली असून शासनास प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला आहे. यासाठी मंत्री भुजबळ यांच्याकडून सातत्याने सबंधित अधिकाऱ्यांकडे आढावा घेऊन या प्रस्तावासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली आहे.

या योजनेसाठी अद्याप निधीची मंजुरी मिळाली नाही. मात्र या योजनेसाठी १६२.३३ कोटीच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता प्राप्त झाली आहे.

सदरील पाणी पुरवठा योजनेसाठी नांदूरमधमेश्वर धरणातून पाणी उचलले जाणार आहे. यासाठी ३.७३७ दलघमी पाणी आरक्षणाचा प्रस्ताव गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबादचे कार्यकारी संचालक किरण कुलकर्णी यांनी शासनास सादर केला असून हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचबरोबर नांदूरमधमेश्वर धरणातून हे पाणी शुद्धीकरणासाठी येवला तालुक्यातील पन्हाळसाठे येथे आवश्यक असलेली जागा खासगी वाटाघाटीतून उपलब्ध करण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी यांच्याकडून जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावासाठी सुद्धा त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.

या योजनेची कृती आराखड्याप्रमाणे अंदाजित किंमत १६२.३३ कोटी एवढी आहे. सदर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमध्ये तालुक्यातील राजापूर, ममदापूर, रेंडाळे, अंगुलगाव, डोंगरगाव, देवदरी, खरवंडी, रहाडी, पिंपळखुटे तिसरे, पन्हाळसाठे, वाघाळे, आहेरवाडी, कोळम खुर्द, पांजरवाडी, जायदरे, हडपसावरगाव, वाईबोथी, खामगाव, देवठाण, गारखेडा, भुलेगाव, मातुलठाण, कौटखेडे, आडसुरेगाव, धामणगाव, लहीत, गोरखनगर, वसंतनगर, चांदगाव, भायखेडा, कोळम बु, कोळगाव, कूसमाडी, नायगव्हाण, खिर्डीसाठे, महालगाव, गणेशपूर, कासारखेडे, दुगलगाव व बोकटे या ४१ अवर्षणप्रवण क्षेत्रातील गावांचा समावेश आहे. पन्हाळसाठे येथून ग्रॅव्हीटीद्वारे सर्व गावांना पाणीपुरवठा होणार आहे.

येवला तालुक्यातील अडतीसगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर इतर गावे जोडल्यामुळे या योजनेवर अतिरिक्त भार निर्माण झालेला आहे. या योजनेतील काही गावांचा समावेश धुळगांवसह १७ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत करण्याच्या सूचना देखील मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार या योजनेचे मंजुरीचे काम देखील प्रगतीपथावर आहे. या योजनेसाठी ५८ कोटी ८१ लक्ष इतका निधी प्रस्तावित करण्यात आलेला आहे. या योजनेच्या मंजुरीसाठी भुजबळांचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.

येवला तालुक्यातील धुळगाव व १७ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेत धुळगाव, पिंपळगाव लेप, एरंडगाव खु., एरंडगाव बु., जळगाव नेऊर, नेऊरगांव, देशमाने बु., मानोरी बु., शिरसगाव लौकी, सतारे, भिंगारे, पुरणगाव, मुखेड, जऊळके, चिंचोली बु., चिंचोली खु., सताळी, बदापूर या गांवाचा समावेश आहे. या योजनांसोबत अडतीस गाव पाणीपुरवठा योजना व लासलगाव विंचूरसह सोळा गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी सोलर यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे.

तसेच सोळा गाव पाणी पुरवठा योजनेची संपूर्ण पाईपलाईन बदलण्यात येत असून संपूर्ण योजनेचे नुतनीकरण करण्यात येत आहे. या सर्व प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण येवला मतदारसंघ हा टँकरमुक्त होणार आहे. यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु असल्याचे वंसत पवार यांनी म्हटले आहे.