तीन महिन्यात इतर पाड्यांवर घरोघरी पाणी देणार

नाशिक । प्रतिनिधी

त्र्यंबक तालुक्यातील खरशेत पैकी असणाऱ्या शेंद्रीपाड्याला आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट महिलांसह गावकऱ्यांशी संवाद साधला. त्याचबरोबर येथील पेयजल योजनेचे उद्घाटन केले.

काही दिवसांपूर्वी खरशेत येथील शेंद्रीपाडातील पाण्यासाठीची भयावह परिस्थिती पाहायला मिळाली. यानंतर आदित्य ठाकरे यांनी तातडीने दखल घेत या ठिकाणी लोखंडी पूल उभारण्याचे आदेश दिले. त्यांनतर काही तासातच इथे लोखंडी पूल उभारण्यात आला. या पार्श्वभूमीवर आज आदित्य ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी शेंद्रीपाड्याला भेट देत त्या जागेची पाहणी केली.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, “आम्ही तुमची माफी मागितली पाहिजे की आतापर्यंत या गोष्टी झाल्या नाहीत. शहरीकरण वाढत असताना राज्यातील अजूनही काही भाग असा आहे की जिथं साध्या सुविधाही पोहचल्या नाहीत. पुढच्या तीन महिन्यात इतर पाड्यांवर घरोघरी पाणी देणार, असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, “तुम्ही अनवाणी चालत असता. इथल्या रस्त्यांवर दगड-गोटे असतात. मीडियाने अशा व्यथा आमच्याकडे पोहोचवाव्यात. पर्यावरण मंत्री म्हणून काम करताना मला अभिमान वाटतो, या सर्व गोष्टी अनुभवायला मिळतात.”

यावेळी आदित्य ठाकरेंनी आयोजित कार्यक्रमात मंचावरील खुर्च्यांवर न बसता आदिवासी बांधवांसोबत खाली जमिनीवर बसत त्यांच्याशी त्यांनी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या.

या वेळी कृषीमंत्री ना.दादा भुसे, खा.हेमंत गोडसे , आमदार सुहासजी कांदे, आ.नरेंद्र दराडे मा.आ.काशिनाथ मेंगाळ, मा.आ.निर्मला गावित, दत्ता गायकवाड, विनायक पांडे , निवृती जाधव, समाधान बोडके व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी नेतेमंडळी उपस्थित होते.