आनंदीबाईंची आनंदवल्ली, अन रहस्यमय भुयारी मार्ग

नाशिक । प्रतिनिधी

आनंदवल्ली परिसर नवश्या गणपतीमुळे तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आनंदीबाईची गढी प्रसिद्ध आहे. दरम्यान येथील गढीच्या जागेत खोदकाम सुरु असताना एक भुयार आढळून आले आहे. त्यामुळे परिसरात चर्चाना उधाण आले आहे.

नाशिकला पुरातन संस्कृतीचा वारसा लाभला आहे. शहरात विविध ऐतिहासिक वास्तू मोठ्या प्रमाणात आहेत. बहुतांश वास्तूची कोसळून दुरावस्था झाली आहे, तर काही वास्तू आजही सुस्थितीत आहेत. येथील आनंदवली परिसरात गेल्या तीनशे वर्षांपासून ऐतिहासिक वारसा असलेली आनंदीबाईंची गढी सर्वांनाच परिचित आहे. मात्र आता ही गढी पूर्णपणे ढासळलेली असून या ठिकाणी आता फक्त तिचे काही अवशेष ग्रामस्थांना बघायला मिळतात.

नवश्या गणपतीजवळ मंगळवारी (ता. २३) नेहमीप्रमाणे खोदकाम सुरू असताना त्या ठिकाणी भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार कामगारांना आढळून आले. त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. या ठिकाणी सापडलेला भुयारी मार्गाचा नेमका वापर कशासाठी होत आहे, हा भुयारी मार्ग नेमका जातो तरी कुठे याचा तपास आता पुरातत्व विभाग करत आहे. दरम्यान हा भुयारी मार्ग सापडल्याने स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

आंनदवल्लीचा इतिहास

नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरात आनंदवल्ली उपनगर पाहायला मिळते. येथील इतिहास असा कि, पूर्वी आनंदवल्ली हे एक लहानसे खेडे होते. त्याला पूर्वी चावंडस या नावाने ओळखले जात होते. रघुनाथराव ऊर्फ राघोबादादा पेशवे हे इ.स. १७६४ मध्ये आनंदवल्लीत येऊन राहिले. त्यानंतर त्यांचा विवाह आनंदीबाईंशी झाला. रघुनाथरावांनी चावंडस येथे पत्नी आनंदीबाई यांच्यासाठी मोठा तटबंदी वाडा बांधला. त्याला आनंदीबाईंची गढी असेही म्हटले जाऊ लागले. पुढे आनंदीबाईंना विनायक हा प्रथम पुत्ररत्न झाल्याने त्या आनंदात त्यांनी गावाचे नाव बदलून ‘आनंदवल्ली’ असे ठेवले, असे म्हटले जाते.