आनंदाची बातमी..! जायकवाडी धरण लवकरच गाठणार ५० टक्क्यांची पातळी

मागील काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. सोबतच गोदावरीच्या उपनद्याही दुथड्या भरून वाहू लागल्या आहेत. याचाच परिणाम आतापर्यंत जायकवाडी धरण तब्बल ४३ टक्के भरले आहे. अशीच स्थिती राहिली तर पुढील काही तासांतच हे धरण ५० टक्क्यांच्या टप्पा ही गाठेल.

नाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी पावसाची संततधार सुरूच आहे. नागरिक पावसाने बेजार झाले आहेत. मागील ४ दिवसांच्या मुसळधार पावसामुळे नांदूरमधमेश्वर धारणातून ८० हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. पण आता पाऊसाचा जोर काही प्रमाणात कमी झाल्याने ५८,६९७ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. धरणातून हा विसर्ग सुरू असल्याने मागील चोवीस तासांत जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल साडे सहा टक्क्यांची वाढ झालेली आहे. नाशिक जिल्ह्यातुन गंगापूर धरणातून ७,१२८ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. दारणामधून ८,८४६ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. कावडमधून २,५९२ तर होळकर ब्रीजमरधून ८,१५० आणि आळंदी वरून २४३ क्यूसेकने विसर्ग सुरूच आहे. त्यामुळे आता पर्यंत जायकवाडी धरणात गेल्या २४ तासांमध्ये १२४ दलघमी पाण्याची आवक झालेली आहे. म्हणजेच मागील २४ तासांत ४.७३ टीएमसी पाण्याची आवक झालेली आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाची पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. अशीच स्थिती राहिल्यात पुढील काही तासांतच जायकवाडी ५० टक्के भरणार असल्याची शक्यता आहे.