राज्यात निर्माण होणार ४८८ आदर्श शाळा, असे आहेत निकष

मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील सर्व मुलांना समान गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळण्याबरोबर विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये विकसित करण्यासाठी राज्य सरकारने आदर्श शाळा विकसित करण्याची महत्वाकांक्षी योजना आखली असून योजनेअंतर्गत लहान शाळांच्या बांधकामासाठी ५३ कोटींचा निधी वितरित करण्याचा निर्णय शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने घेतला आहे.

मुलांना समान गुणवत्तापूर्वक सर्वोच्च शिक्षण देण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यात ४८८ आदर्श शाळा निर्माण करण्याची योजना राज्य सरकारने आखला आहे. शासकीय शाळांचा चेहरामोहरा बदलण्याच्या हेतूने या आदर्श शाळा विकसित करण्याची योजना आहे.

आदर्श शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी सुसज्ज भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे, वर्ग खोल्या संगणकीकरण शाळा दुरुस्ती, शैक्षणिक साहित्य अशा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या निधीचा उपयोग करण्यात येणार आहे. या शाळांचा विविध स्तरावर विकास केला जाईल.

आदर्श शाळा योजने अंतर्गत विशिष्ट निकषांच्या आधारे शाळांची निवड करण्यात येते. यामध्य वाढता लोकसहभाग, भविष्यातील वाढती पटसंख्या आणि किमान १०० तसेच १५० पटसंख्या, शाळेच्या प्रांगणात अंगणवाडी, विद्यार्थी संख्येनुसार वर्ग खोल्या, मुला-मुलींसाठी स्वतंत्र आणि पुरेशी स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, हँडवाँश स्टेशन, मध्यान्ह भोजनासाठी स्वयंपाकगृह, शैक्षणिक साहित्य, खेळाचे साहित्य, ग्रंथालय, वाचनालय, संगणक कक्ष, व्हर्च्युअल क्लास रुम, शाळेला संरक्षण भिंत, आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने अग्नीशमन यंत्रणा, विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था, इयत्ती पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे तयारी असे आदर्श शाळा निवडीचे निकष आहेत.