केंद्र सरकारला छत्रपतीं शिवरायांचा विसर – छगन भुजबळ

नाशिक । प्रतिनिधी

केंद्रातल्या भाजप सरकारने निवडणुकांच्या अगोदर ‘छत्रपतींचा आशिर्वाद’ असे म्हणत जाहिरातबाजी केली आता मात्र त्यांच्या सरकारला शिवाजी महाराजांचा विसर पडला आहे का..? असा खणखणीत सवाल पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारला केला आहे.

कर्नाटकातल्या बंगळुरु येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून विटंबना करण्यात आल्याचा प्रकार घडला. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. ते म्हणाले कि, विटंबना करणाऱ्या कन्नड गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो. कर्नाटकातल्या मुख्यमंत्र्यांनी यात तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे असून दोषींवर तातडीने कारवाई करावी अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

त्याचबरोबर ते म्हणाले कि, महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राज्याचे नाहीतर संपूर्ण भारताचे दैवत आहे. त्यामुळे त्यांच्या पुतळ्याची विटंबना महाराष्ट्र कदापिही सहन करणार नाही. कर्नाटक सरकारने बेळगाववर हक्क सांगण्यासाठी तिथे अधिवेशनाचा घाट घातला असल्याचे टीका त्यांनी यावेळी केली.

ते पुढे म्हणाले कि, मराठी जनतेवरच्या अन्यायामुळे आपण यशस्वी होऊ असा कर्नाटकचा समज असेल तर त्यांनी तो काढून टाकावा. रस्त्यावरच्या आणि न्यायालयातल्या दोन्ही लढायांत विजय मिळेपर्यंत महाराष्ट्र स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान त्या घटनेचे आता पडसाद महाराष्ट्रात ही उमटू लागले आहेत. विटंबनेची बातमी समाजमाध्यमांवर व्हायरल होताच शुक्रवारी रात्री कोल्हापुरात पडसाद उमटले.