पुढारी नमस्कार करत नाहीत, त्यांच्या बापाचे काय जाते कळत नाही : उपमुख्यमंत्री

नाशिक | प्रतिनिधी

आम्ही कैक वर्षांपासून राजकारणात आहोत, सगळीकडे गेलो की जेष्ठांचे आशीर्वाद घेत असतो, मात्र आताचे पुढारी नमस्कार सुद्धा करत नाही, त्यांच्या बापाचे काय जाते कळत नाही असा जोरदार टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.

कळवण तालुक्यातील नाकोडे गावात विविध विकास कामाचे भूमिपूजन, उद्घाटन कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. रोज कोण कोण बोलतात सरकार जाणार, सरकार जाणार म्हणणारे देव पाण्यात ठेवून बसले आहेत. पण सरकारचे दुसरीकडे काम सुरू असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने, शरद पवार यांच्या मार्गदर्शनात सरकार पुढे जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही पक्ष काम करत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, सरकारविषयी कोणीही काही बोलतो, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. एसटीचा संप सुरू आहे तर कोणी बस फोडतो आहे, हे व्यवहाराला धरून नसल्याचे त्यांनी सांगितले. जन्मताच कोणी ताम्रपत्र घेऊन येत नाही, सत्ता येते सत्ता जाते फक्त माणसाने जमिनीवर राहिले पाहिजे, असे प्रतिपादन यावेळी पवार यांनी केले.

यावेळी अजित पवार यांनी कोरोना, नाशिकमधील विकास कामांवर भाष्य केले. सप्तश्रृंगी गडावर विकासासाठी 22 कोटी 50 लाखाचा आराखडा मंजूर आहे. विकास कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे त्यांनी म्हटले.