मुंबईत आगडोंब, ४५ बीएमडब्ल्यू गाड्यांचा ‘जाळ अन धूर’

मुंबई । प्रतिनिधी

नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसीत आगडोंब उसळला. यात बीएमडब्ल्यू गाड्यांच्या गोदामाला आगीत ४५ वाहने भस्मसात झाली आहेत. तुर्भे एमआयडीसीच्या अग्निशामक दलाच्या वाहनांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, या भीषण आगीमुळे एमआयडीसी परिसरात धुराचे प्रचंड लोळ उठत होते.

नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसीमध्ये बीएमडब्ल्यू गाड्यांच्या गोदामाला आग लागल्याने तब्बल ४० ते ४५ गाड्या जाळून खाक झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसीतील बीएमडब्ल्यूच्या गोडाऊनला लागलेली आग विझवण्यासाठी नेरुळ, वाशी, एमआयडीसी अग्निशमनच्या १० गाड्या दाखल झाल्या होत्या.

दरम्यान या गोडाऊनला कोणत्या कारणामुळे आग लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. बीएमडब्ल्यू गोडाऊन आग प्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी यात झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.