जिल्ह्यातील बंद पडलेले साखर कारखाने सुरु करणार : राजू शेट्टी

नाशिक । प्रतिनिधी

बांधावर जाऊन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या संदर्भात कायदा करावा तसेच फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर सरकारने कारवाई केली नाहीतर स्वाभिमानी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे. ते आज नाशिक येथे पत्रकारांशी बोलत होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आज नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, पश्चिम महाराष्ट्रात प्रमाणे नाशिक मध्ये देखील ऊस आणि द्राक्ष परिषद होणार असून या माध्यमातून लवकरच नाशिक जिल्ह्यातले बहुतेक बंद पडलेले साखर कारखाने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर उसाला 3700 रुपये क्विंटल ला भाव देण्याबरोबर राज्यातील बंद पडलेले साखर कारखान्यांची चौकशी करून पुन्हा सुरू करण्याची मागणी देखील या निमित्ताने त्यांनी केली.

ते पुढे म्हणाले कि, सध्या वातावरणात बदल झाल्याने नाशिक जिल्ह्यातल्या द्राक्ष पीक अडचणीत आली असून शेतकऱ्यांनी याकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्याचबरोबर गिरणारे बाजारपेठेत टोमटो व्यापाऱ्याने फसवणूक केल्याने यापुढे परवानगी धारक व्यापाऱ्यांनीच फक्त द्राक्ष खरेदी करावी, फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर सरकारने कारवाई केली नाहीतर रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.

राज्यातील बंद पडलेले साखर कारखान्यांची चौकशी करून पुन्हा सुरू करण्याची त्याचबरोबर साखर कारखान्या संदर्भात ते हणाले कि, ज्या साखर कारखान्यात गैरव्यवहार होत असेल त्या साखर कारखान्याची चौकशी करण्यात यावी. परंतु भाजप मध्ये आलेल्या लोकांच्या निगडीत साखर कारखानदारांची चौकशी होत नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून यावर शासनाने लवकरात लवकर तोडगा काढणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी देखील संयमाने संप हाताळला पाहिजे, कर्मचाऱ्यांच्या मागणीवर सरकारला विचार करायला वेळ दिला पाहीजे. पण या आंदोलनात अभ्यास न करता काही उथळ नेते घुसल्याच्या खोचक टोला त्यांनी यावेळी दिला.