मुंबई-आग्रा महामार्गावर झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी मृत्यू.

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव इथल्या चार जणांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आजरोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मुंढेगावकडे येत असताना मुंबई आग्रा महामार्गावर एका युवकाच्या दुचाकीला ट्रकने कट मारल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील 3 बालिका आणि युवक हे चौघे ट्रकच्या चाकाखाली चिरडले गेल्याने त्यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ह्या घटनेमुळे मुंढेगाव परिसराबाबरोबर इगतपुरी तालुक्यात मोठी शोककळा पसरली आहे. या बाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे.


याबाबत अधिक मिळालेली माहिती अशी कि, इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील तुषार हरी कडू (वय २४) हा युवक मोटारसायकलीवरून घोटी येथे दीपावली निमित्त खरेदी करण्यासाठी पायल ज्ञानेश्वर गतीर (वय ११), विशाखा ज्ञानेश्वर गतीर(वय ८) रा. मुंढेगाव, ईश्वरी हिरामण डावखर (वय १०) रा. गिरणारे ता. इगतपुरी यांना घेऊन घोटी याठिकाणी गेला होता. खरेदी करून गावाकडे परतत असताना त्यांच्या दुचाकीला एका ट्रकने कट मारला.यामध्ये मोटारसायकलवरील तीन चिमुरड्या आणि दुचाकी चालवणारा युवक खाली पडले त्यात या सर्वांच्या अंगावरून ट्रक गेल्याने चौघे चिरडले गेले आणि त्यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेने सर्व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे…