जिल्ह्यातील दिव्यांगांचे तीन महिन्यात ओळखपत्र मिळणार

नाशिक । प्रतिनिधी
दिव्यांग जरी असली तरी व्यक्ती ही व्यक्ती आहे. तिचा सन्मान ठेवणे आवश्यक आहे. केंद्र सरकारकडून दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र दिले जात असून सदरचे ओळखपत्र प्राप्त करणे प्रत्येक दिव्यांगाचा मुलभूत अधिकार आहे. सर्व दिव्यांग बांधवांनी वैश्विक प्रमाणपत्र काढण्यासाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले. त्याचप्रमाणे आजादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत सर्व दिव्यांगाचे वैश्विक ओळखपत्र ९० दिवसांच्या आत काढण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

संविधान दिनानिमित्त आज जिल्हा परिषदेच्या स्व. रावसाहेब थोरात सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. याच कार्यक्रमात समाजकल्याण विभागांतर्गत वैश्विक प्रमाणपत्र व कायदेशीर पालकत्व प्रमाणपत्रांचे प्रतिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले. सर्व १५ तालुक्यात गटविकास अधिकारी यांचेमार्फत वैश्विक प्रमाणपत्र वाटप करण्यात येत असल्याची माहिती समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी यावेळी दिली.

यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी वैश्विक ओळखपत्र व कायदेशीर पालकत्व प्रमाणपत्रासाठी महत्वाचे योगदान देणा-या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी यांचे कौतुक केले. तसेच जिल्हयातील सर्व दिव्यांग बांधवांना वैश्विक प्रमाणपत्र मिळणेसाठी तळागाळापर्यत माहिती पोहचविण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी, समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दिव्यांग कुटुंबांसांठी प्रमाणपत्रांचे महत्व अधिक
गेलया ७ ते ८ वर्षापासून भाऊ व बहिणीच्या कायदेशीर पालकत्वासाठी पाठपुरावा सुरु होता मात्र जिल्हा परिषदेच्या समितीचे व प्रबोधिनी शाळेच्या माध्यमातून अवघ्या सहा महिन्यात मला प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. ज्या कुटुंबामध्ये दिव्यांग व्यक्ती असतात त्याच कुटुंबांना वैश्विक प्रमाणपत्र व कायदेशीर पालकत्व प्रमाणपत्राचे महत्व कळते. जिल्हा परिषदेने संविधान दिनाच्या दिवशी सन्मानपुर्वक कायदेशीर पालकत्वाचे प्रमाणपत्र दिल्याचे समाधान आहे. जिल्हयातील सर्व दिव्यांग बांधवांनी वैश्विक प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी पुढे यावे. – दिप्ती हिरवे, कायदेशीर प्रमाणपत्र प्राप्त पालक