वाडीवऱ्हेत बिबटयाचा युवकावर हल्ला

नाशिक । प्रतिनिधी
वाडीव-हे परिसरात गेल्या काही दिवसांत बिबटयांचा वावर वाढल्याचे दिसून येत असून जाधववाडी रस्त्यावर असलेल्या एका शेतकरी युवकावर काल सांयकाळी बिबटयाने हल्ला केल्याने युवक जखमी झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली असून पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.

वाडीव-हे परिसरात मूकणे धरण, वालदेवी धरण आणि वाडीव-हे लघु पाट बंधारा असे जलाशय असल्याने बिबटयांना पोषक वातावरण आहे. त्यामुळे या भागात बिबट्यांची संख्या लक्षणीय आहे. वाडी वस्तिवर, शेतात घरे बांधून राहणाऱ्या नागरिकांना नेहमीच बिबटया, तरस, कोल्हे नजरेला पड़त असतात. मात्र काही दिवसांत शेतकऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले असून दोन दिवसांपूर्वी शरद संपत कातोरे यांच्या शेतात काम करणाऱ्या मजूरावर बिबटयाने हल्ला केला होता, मात्र सुदैवाने तो वाचला.

दरम्यान काल सांयंकाळच्या सुमारास जाधव वाडी रस्त्यावर रमेश गवते यांच्या काकड़ीच्या शेतात त्यांचा मुलगा अमोल रमेश गवते हा ड्रीपला पाणी सोडून परतत असतांना शेतात दबा धरून बसलेल्या बिबटयाने अचानक त्याच्यावर हल्ला केला. यावेळी अमोलने आरडा ओरडा केल्याने बिबटयाने धूम ठोकली. मटार बिबट्याने अमोलच्या हाताला चावा घेतल्याने खोल जखमा झाल्या आहेत. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार केले आहेत. चार

या घटने मुळे परिसरात घबराट पसरली असून वनविभागाने या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.