…म्हणून नाशिकचे निर्बंध हटवता येत नाहीत!

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात लावण्यात आलेले कोरोना निर्बंध हे आणखी काही दिवस जैसे थे ठेवण्यात येणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. त्यामुळे नाशिककरांना कोरोनाच्या निर्बंधातून पूर्णपणे सुटका होण्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.

मंत्री राजेश टोपे हे नाशिक येथे कृमाग्रज प्रतिष्ठानच्या गोदावरी गौरव पुरस्कार प्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकांराशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. आता नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी लसीकरण मात्र अद्यापही अनेक नागरिकांचे बाकी असल्याने आताच निर्बंध शिथिल करता येणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नाशिक शहराची लसीकरण आकडेवारी चांगली असली तरी मालेगाव आणि इतर ग्रामीण भागात अद्यापही लसीकरण झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नाशिक प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लसीकरण करून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

नाशिक शहरात लसीकरणाचे प्रमाण हे ९० टक्क्यांवर आहे तर ग्रामीन भागात लसीकरणाचे प्रमाण हे ६० टक्क्यांवर असून मालेगाव येथे हेच प्रमाण अत्यंत कमी ४० टाक्यांच्या जवळपास असल्याने नाशिक जिल्ह्यातील कोरोना निर्बंध हे अद्याप तरी पूर्णपणे हटविले जाणार नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हंटल आहे. तर ज्या ज्या भागात लसीकरणाच प्रमाण कमी आहे.

त्या ठिकाणच्या जास्तीत जास्त नागरिकांनी आपले लसीकरण करू घ्यावे असे आवाहन देखील टोपे यांनी केले आहे. याबाबत कॅबिनेट मध्ये झालेल्या बैठकीत देखील चर्चा झाली असल्याचे मंत्री टोपे यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हंटलं आहे.

अनेक जिल्ह्यांमध्ये झिरो झिरो अशा पद्धतीचं नवीन रुग्णांचे निदान होण्याचं प्रमाण आहे. या अनुषंगाने आता फक्त जो पॅरामिटर राहिला आहे त्याच्या अनुषंगाने निर्बंध हटवायचे ते म्हणजे व्हॅक्सिनेशन आहे. त्यामुळे लसीकरणावर अधिक जोर देण्याचं काम त्या त्या जिल्ह्याच्या प्रशासनाने केले पाहिजे, हा आग्रह मुख्यमंत्र्यांचा आहे. लसीकरण कार्यक्रम चालू असायलाच हवा, त्यात दुसरा विचार नाही किंवा दुमत असण्याचं कारणच नाही, त्यामुळे लवकर हे सर्व खुल होईल, अशी आशावादी भूमिका आम्ही घेतली असून याबाबत मुख्यमंत्री लवकरच सकारात्मक निर्णय देतील असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले