कांद्याला कवडीमोल भाव ; नाशिकच्या शेतकऱ्याने उचलले मोठे पाऊल

नाशिक : आधीच संकटात असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा संकट पावसाने अजून वाढवले आहे. शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. कांद्याला मिळत असलेल्या कवडीमोल भावामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे त्याला होळी सणाच्या दिवशी कांद्याची होळी करण्याची वेळ आली आहे. येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांद्याला हमीभाव नसल्यामुळे कांद्याची होळी केली आहे.

पीक उभे करायला आणि ते तयार करायला अफाट खर्च आला. मात्र त्याला विकून हातात काहीच उरत नसल्याने शेतकऱ्याने तब्बल दीड एकरावरील कांद्याची होळी केली आहे. कांद्याच्या भावात घसरण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशात आज होळी सणाच्या दिवशी येवल्याच्या एका शेतकऱ्याने थेट दीड एकरावरील कांद्यांची होळी केली आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तर कांद्याच्या भावाने अक्षरशः रडवले आहे. कांद्याचे दर वाढल्यानंतर केंद्र सरकारकडून तात्काळ महाराष्ट्रात केंद्रीय पथक पाठवली जातात आणि कांद्याची निर्यात बंद करून कांदा परदेशी आयात केला जातो. मात्र आता कांद्याच्या भावात घसरण्यात झाल्यानंतर केंद्र सरकार गप्प असल्याने कांदा उत्पादक शेतकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. अनेक आंदोलने करण्यात आली. सभागृहात देखील कांदा प्रश्न पेटला. मात्र परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे येवल्याच्या शेतकऱ्याने कांद्याची होळी पेटवत संताप व्यक्त केला आहे.

कांदा प्रश्न पेटल्यानंतर सरकारने नाफेडकडून कांदा खरेदी केली जाणार अशी घोषणा केली. मात्र कांद्याच्या भावात काही सुधार दिसून आला आणी. त्याबाबत शेतकरी फार समाधानी नाही. त्यामुळे अजुनही सरकार बद्दल शेतकऱ्यांचा केंद्र आणि राज्य सरकारांवर रोष आहे. याच पार्श्वभूमीवर कांदा दरांतील सततच्या घसरणीला वैतागून येवला तालुक्यातील नगरसूल येथील शेतकऱ्याने होळीच्या मुहूर्तावर मोठे पाऊल उचलले आहे. या शेतकऱ्याने आपल्या दीड एकर क्षेत्रावरील कांदा पिकाला अग्निडाग देऊन होळी साजरी करून सरकारी अनास्थेचा निषेध नोंदवला आहे. या शेतकऱ्याने नाफेडवर देखीउल रोष व्यक्त करत निषेध केला आहे.