नाशकात अवकाळी पावसाची हजेरी; पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली

नाशिक : शहरासह जिल्ह्यात एकीकडे उन्हाचा पारा चढलेला तर एकीकडे ढगाळ वातावरण पाहायला मिळत होत. त्यामुळे बहुतांश भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली होती. अशात पहाटे चार वाजेच्या सुमारास ढगांच्या गडगडाटा सह पावसाने हजेरी लावली.

दरम्यान या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. या पावसाचा रब्बी पिकांना फटका बसणार आहे. काढणीस आलेला गहू, हरभरा, मसूर अशी रब्बी पिके संकटात सापडली आहेत. काही शेतकऱ्यांनी गहू, हरभरा कापून शेतामध्ये ठेवला आहे. तर काही शेतकऱ्यांचा गहू पूर्ण वाळून हा अजून देखील शेतामध्ये उभा आहे. त्यामुळे या अवकाळी तुरळक पावसाने शेतकऱ्यांची धाकधुक वाढवली आहे.

कांदा पिकांवर येणारे मावा करपा रोगाच्या संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागेल व नुकतेच आलेले आंब्याचे मोहर देखील करपण्याची शक्यता आहे. एकीकडे भाजीपाल्याचे भाव कोसळले अन् एकीकडे अवकाळी पावसाचा फटका.जनावरांना जमा करून ठेवलेला चारा खुराक पूर्ण ओला झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावतो की काय असं शेतकऱ्यानां वाटत आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. मध्य रात्रीपासूनच ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू झाला होता. त्यानंतर पहाटेपासून पावसाच्या सरी कोसळायला लागल्या. त्यामुळे एकीकडे शेतीमालाला मातीमोल भाव मिळत असताना अवकाळी पावसाच्या हजेरीने शेतकरी चिंतेत पडला आहे.

दोन दिवसापासूनच नाशिक शहरासह जिल्ह्याच्या वातावरणात बदल झालेला होता. त्यानुसार हवामान खात्यानं जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. काल दिवसभर वातावरणात उकाडा जाणवत होता. त्यानंतर काही ठिकाणी मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली आणि ढगाच्या गडगडाटाश सकाळपर्यंत पाऊस सुरू होता.

नाशिक जिल्ह्यातील येवला पट्ट्यात निफाड, लासलगावसह अन्य काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी हजेरीमुळे कांदा, गहू, हरभरा, आंबा, द्राक्षं यांसह भाजीपाल्याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण वगळता इतर महाराष्ट्रात ८ मार्चपर्यंत गडगडाटासह तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज आहे. येत्या मंगळवारी ७ मार्चला गारपिटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणखी पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ८ मार्चपर्यंत नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.