आमदार डॉ. राहुल आहेर शेतकऱ्यांसह रस्त्यावर!

नाशिक । प्रतिनिधी

शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करावा त्याचप्रमाणे थकीत वीज बिलासाठी खंडीत केलेला ग्रामीण भागातील वीज पुरवठा त्वरीत सुरळीत करावा या मागणीसाठी आज सोमवार भाजपच्या वतीने आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई-आग्रा महमार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्या बाबतीत भाजप आक्रमक झाले असून याबाबत आवाज उठवण्यासाठी ठिय्या आंदोलनाला सुरवात झाली. जिल्ह्यातील ग्रामीण तालुक्यातील शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध असून सध्या रब्बी पिकांची पेरणी करून गहू, मका, हरभरा भुईमूग इत्यादी पिकांना सिंचनासाठी पाण्याची आवश्यकता असते, मात्र विद्युत विभागाकडून शेतकऱ्यांना कधी दिवसा तर कधी रात्री वीज पुरवठा केला जातो. तर काही ठिकाणी थकीत वीजबिलामुळे वीज पुरवठाच खंडित केल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण भाजपने आज रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारला. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखाली चांदवडला मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको करून ठिय्या आंदोलन करण्यात आले.

तसेच सक्तीची वीज बिल वसुली थांबविण्यात यावी, शेतकऱ्यांना वीज बिलातून सुटका द्यावी अशा विविध मागण्यासाठी चांदवड भाजपने आंदोलन केले. दरम्यान आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मात्र कालांतराने सुरळीत झाली.