अवकाळीचा द्राक्ष बागांना फटका, ‘अशी’ घ्या काळजी

नाशिक | प्रतिनिधी

द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात कालपासून अवकाळी पाऊस बरसत आहे. यामुळे द्राक्षपिकावर परिणाम होण्याची शक्यता कृषी तज्ञांनी वर्तविली आहे.

दरम्यान सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाने पिकांचे होत्याचे नव्हते केले होते. आता यानंतर वातावरणातील बदलाचा सर्वाधिक फटका फळबागांना बसत आहे. ऐन पिक पदरात पडण्याच्या दरम्यानच राज्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे द्राक्ष बागांचे सर्वाधिक नुकसान होत आहे. त्यामुळे या बागांचे व्यवस्थापन झाले तरच शेतकऱ्यांना उत्पादन हाती लागणार आहे.

नाशिक जिल्ह्यांत सर्वाधिक द्राक्ष पिकाची लागवड केली जाते. सध्या या बागा फुलोरा आणि मणी फुगण्याच्या अवस्थेत आहेत. दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि काल दिवसभर झालेल्या पावसानंतर द्राक्ष बागांची अवस्था बिकट झाली आहे. यामुळे फळकूज, मणीगळ, डाऊनी व भुरा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

असे करा व्यवस्थापन
सध्या असलेल्या ढगाळ वातावरणात शेतकऱ्यांनी द्राक्ष पिकांचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. वाढलेल्या आर्द्रतेमुळे भुरी व केवडा या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. द्राक्ष बागेत मोकळी कॅनोपी असणे आवश्यक असून त्यामुळे सूक्ष्म वातावरण निर्माण होणार नाही. परिणामी रोगांचा प्रादुर्भाव होण्यास अटकाव होईल. तसेच झाडाची प्रत्येक काडी मोकळी राहील, याकडे लक्ष गरजेचे आहे.